Friday, 9 March 2018

मराठी भाषेतील वृत्तपत्रे

           Image result for वृत्तपत्र
         
           सुरुवातीच्या काळातील  वृत्तपत्रे हि मतपत्रे म्हणून ओळखली जातात. पहिल्या महायुद्धानंतर वृत्तपत्रीय स्वरुपात बदल होऊन व्यावसायिक पत्रकारितेचा उदय झालेला दिसून येतो. बंगालमधील श्रीरामपूर मिशनच्या डॉ. विल्यम कॅरी  यांनी १८१८ साली ‘समाजदर्पण’ नावाचे पहिले बंगाली मासिक सुरु केले. त्यानंतर 14 वर्षांनी बाळशास्त्री जांभेकरांनी मुंबईतून ६ जानेवारी १८३२ रोजी ‘दर्पण’ नावाचे वृत्तपत्र सुरु केले. सुरुवातीला पाक्षिक आणि नंतर मे १८३२ पासून हे वृत्तपत्र साप्ताहिक झाले.  या पत्रात इंग्रजी व मराठी अशा दोन्ही भाषांत मजकूर छापला जात असे. जांभेकर यांना संपादनाच्या कार्यात भाऊ महाजन (ऊर्फ गोविंद विठ्ठल कुंटे) यांचे सहकार्य लाभत असे. बेअदबी प्रकरणाची झळ लागून दर्पण १८४० साली बंद पडले.
      जांभेकरांनी  १८४० च्या मे महिन्यात ‘दिग्दर्शन’ हे मराठी नियतकालिक सुरु केले. हे मासिक साहित्य, इतिहास आणि तत्वज्ञान या विषयांना वाहिलेले होते. दर्पण बंद करून १८४० साली त्याच्याच चालकांनी पूर्णपणे मराठी भाषेतील मजकुराचे वृत्तपत्र म्हणून मुंबई अखबार सुरु केला. ते दर शनिवारी प्रसिद्ध होई. याच सुमारास १८४२ मध्ये आहमदनगर येथे ख्रिस्ती मिशनर्यांनी ‘ज्ञानोदय’ हे मासिक सुरु केले. १८७३ मध्ये ज्ञानोदय साप्ताहिक झाले. इंग्रजी व मराठी अशा भाषांतून प्रसिद्ध होणार्या या साप्ताहिकाचे रेव्हरंड हेंनी बॅलंटाइन हे पहिले संपादक होते. 
          त्यानंतर ‘प्रभाकर’ हे वृत्तपत्र २४ ऑक्टोबर १८४१ रोजी सुरु झाले. भाऊ महाजन हे प्रभाकरचे संपादक होते. प्रभाकरचे मुख्य वैशिष्टय़ म्हणजे त्यात प्रसिध्द झालेली शतपत्रे. ही शतपत्रे गोपाळ हरी देशमुख ऊर्फ लोकहितवादी  लिहीत असत. हे साप्ताहिक १८६५ साली बंद पडले. प्रभाकरशी स्पर्धा करणाऱ्या ‘वर्तमानदीपिका’ या वृत्तपत्राला तोंड देण्यासाठी भाऊ महाजन यां धूमकेतू’ (१८५३) नावाचे वृत्तपत्र काढले .
           वीरेश्वर छत्रे यांनी १८४२ साली मुंबई येथे ‘ज्ञानसिंधू’ साप्ताहिकाची सुरुवात केली. अनेक सामाजिक प्रश्नांवर ज्ञानसिंधुमधून जांभेकरांच्या दर्पांमधील मतांचाच पाठपुरावा केला जात असे. मात्र दिर्गकाळ हे वृत्तपत्र चालू शकले नाही.त्यानंतर १८४४ साली ‘मित्रोदय’ आणि १८४८ साली ‘अरुणोदय’ हे वृपत्रे वीरेश्वर छत्रे यांनी काढले.
            मित्रोदय हे पुण्यातून निघालेले पहिले मराठी वृत्तपत्र. परंतु हे वृत्तपत्र दिर्गकाळ चालले नाही. १२ फेब्रुवारी १८४९ रोजी ‘ज्ञानप्रकाश’ सुरु झाले  .ज्ञान प्रकाशापासून पुण्यातील व्यवसायाला व पत्रकारितेला खर्या अर्थाने प्रारंभ झाला. १९०९ मध्ये भारत सेवक समाजाने हे वृत्तपत्र चालविण्यास घेतले.त्यानंतर नेमस्तांचे मुखपत्र अशी त्याची प्रतिमा निर्माण झाली. ज्ञानप्रकाशचे पहिले संपादक होण्याचा मान विख्यात मराठी कादंबरीकार हरी नारायण  आपटे यांना मिळाला. ‘ सत्य, सौख्य आणि ज्ञान’ हे त्याचे ब्रीदवाक्य होते.  महादेव गोविंद रानडे, विष्णुशास्त्री चिपळूणकर, गोपाळ कृष्ण गोखले यांसारख्या नामवंत व्यक्ती ज्ञानप्रकाशमधून लेखन करीत. 
               १८५२ साली ‘विचारलहरी’ नावाचे वृत्तपत्र कृष्णशास्त्री चिपळूणकर यांनी काढले. जानेवारी १८६२ पासून ‘इंदुप्रकाश’ हे वृत्तपत्र साप्ताहिकरुपात मुंबईहून प्रसिद्ध होऊ लागले. ते काढण्यात लोकहितवादींचाच पुढाकार होता. इंदुप्रकाश इंग्रजी व मराठी अशा दोन्ही भाषांतून प्रसिद्ध होई. इंग्रजी विभागाचे संपादक न्यायमूर्ती रानडे होते, तर मराठी विभागाचे संपादक म्हणून जनार्दन सखाराम गाडगीळ काम पाहत.
             १८६७ साली संस्कृत व इंग्रजीतले ज्ञान मराठी भाषिकांपर्यंत पोहचविन्याच्या उद्देशाने ‘विविध ज्ञान विस्तार’ या मासिकाची सुरुवात झाली. मराठी वृत्तपत्रांतून व्यंगचित्रे छापण्याची प्रथा हिंदु पंचने १८७२ साली सुरु केली.
                 ‘सुबोध पत्रिका’ हे प्रार्थना समाजाचे मुखपत्र म्हणून १८७३ मध्ये सुरु झाले. समाज व धर्मासंबंधीचे  सुधारनाविषयक  चर्चा  या पत्रातून होत. प्रार्थना समाजाचे धर्मासंबधीचे विचार प्रसारित करणे आणि त्यावरील आक्षेपांना उत्तर देणे हा त्यामागील हेतू होता. महात्मा फुल्यांच्या प्रेरणेने कृष्णराव भालेकर यांनी १८७७ साली पुण्यात दीनबंधू पत्राची सुरुवात केली. महात्मा फुल्यांच्या कार्याचा प्रसार व्हावा, विचार जागृतीची, समतेची प्रेरणा मिळावी या उद्देशाने त्यांनी स्वतःच्या खर्चाने हे पत्र सुरू केले होते.
               लोकमान्य टिळक व गोपाळ गणेश आगरकर यांनी २ जानेवारी १८८१ ला ‘मराठा’ ४ जानेवारी १८८१ ला ‘केसरी’ हे वृत्तपत्र काढले. लोकमान्य टिळक हे मराठाचे पहिले संपादक, तर गोपाळ गणेश आगरकर  हे केसरीचे पहिले संपादक होते. १८८४ साली दीनबंधुमधून  सार्वजनिक सभेची स्थापना करण्यात आली. या सार्वजनिक सभेचे मुखपत्र म्हणून ‘दीनमित्र’ वृत्तपत्र सुरू झाले. हे दीनमित्र मासिक भालेकरांचे भाचे गणपतराव पाटील चालवत असत.

          केसरी वृत्तपत्रानंतर महाराष्ट्रात १५ ऑक्टोबर १८८८ रोजी ‘सुधारक’ ह्या साप्ताहिकाचा पहिला अंक निघाला. गोपाळ गणेश आगरकरांनी हे वृत्तपत्र काढले होते. सुरुवातीच्या काळात सुधारक वृत्तपत्रात  इंग्रंजी व मराठी या दोन्ही भाषांमधून मजकूर प्रसिद्ध होई.३ जुलै १९१६ रोजी सुधारक बंद पडले. १८८९ साली किसन फागुजी बनसोड यांनी ‘विटाळ-विध्वंसक’ नावाचे वृत्तपत्र काढले. चळवळीसाठी स्वतःचा छापखाना उभारून वृत्तपत्र चालवले. कालीचरण नंदागवळी हे बनसोड यांचे सहाय्यक होते.

              केसरीच्या पाठोपाठ महाराष्ट्रात जी वृत्तपत्रे निघाली त्यात काळ, सुधारक आणि संदेश या वृत्तपत्रांची कामगिरी खूप मोठी होती. २५ मार्च १८९८ रोजी शिवराम महादेव परांजपे  यांनी ‘काळ’ हे साप्ताहिक सुरु केले. सयाजीराव गायकवाड, शिवाजीराव होळकर, विश्राम रामजी घोले यांच्या मदतीने (आर्थिक साहाय्याने) सत्यधर्म समाजाने ‘सत्यप्रकाश’ नावाचे पत्र काढले. मात्र ते लवकरच बंद करावे लागले. भास्कर बळवंत भोपटकर यांनी ५ एप्रिल १९०५ रोजी  भालाचा’ पहिला अंक प्रकाशित केला. १९०८ च्या जुलै महिन्यात शिवराम जानबा कांबळे यांनी या मासिकाची सुरुवात केली. ३ वर्षे हे मासिक चालवले. १४ जानेवारी १९१५ रोजी अच्युत बळवंत कोल्हटकर  यांनी मुंबईतून ‘संदेश’ हे वृत्तपत्र दैनिकरुपात सुरु केले. 
.         छत्रपती शाहू महाराजांच्या मदतीने १९२० साली डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ‘मूकनायक’ या पाक्षिकाची सुरुवात केली. संपादकपदी पांडुरंग नंदुराम भटकर या तरुणाची नेमणूक केली. बाबासाहेबांच्या चळवळीचे ते मुखपत्र होते. ८ एप्रिल १९२३ साली हे पत्र बंद पडले. ३ एप्रिल १९२१ साली ‘बहिष्कृत भारत’ पाक्षिकाची सुरुवात झाली. याचे संपादक स्वतः बाबासाहेब आंबेडकर होते. या पत्रात ते अग्रलेख, स्फुटे लिहित. १९२९ साली बहिष्कृत भारत बंद पडले. १९२० साली पाक्षिक म्हणून ‘जनता’ पत्राची सुरुवात झाली. नंतर त्याचे साप्ताहिकात रूपांतर करण्यात आले. ४ फेब्रुवारी १९५६ रोजी ‘जनता’ साप्ताहिकाचे ‘प्रबुद्ध भारत’ साप्ताहिकात रूपांतर करण्यात आले.

         टिळक यांच्या निधनानंतर १९२१ मध्ये मुंबईहून ‘लोकमान्य’ दैनिक सुरु झाले. कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर हे त्याचे पहिले संपादक होते.  मात्र १९२३ साली झालेल्या मतभेदामुळे खाडिलकरांनी संपादकपद सोडले. आणि १९२५  मध्ये ते बंद पडले.
            खाडिलकर यांनी लोकमान्य सोडल्यावर स्वतःचे ‘नवाकाळ’ हे दैनिक मुंबईतून ७ मार्च १९२३ रोजी सुरु केले. 
‘तरुण भारत’  हे दैनिक मुळात साप्ताहिक स्वरुपात २० जानेवारी १९२३ रोजी नागपूर येथून सुरु झाले. नागपूरचे जेष्ठ राजकीय नेते मोरोपंत अभ्यंकर यांच्या प्रेरणेने हे सुरु झाले.
   समकालीन वृत्तपत्रांचा अभ्यास करून नानासाहेभ परुळेकरांनी १ जानेवारी १९३२  पासून पुण्यात ‘दैनिक सकाळ’ हे वृत्तपत्र सुरु केले. १९३५ ते १९५० या काळात पुण्यातून लोकमत, लोकहित, नवभारत , अग्रणी यांसारखी दैनिके प्रसिद्ध होत होती.

1 comment: