Thursday, 1 March 2018

रेडीओ निवेदन


                              
               गेले शंभर वर्ष सुरुवातीला श्रीमंतीच प्रतिक असलेला रेडिओ पुढे सर्वसामान्यांचा सामान्य करमणुकीचा साधन बनला तर कित्येकांच्या उपजीविकेचे संसाधन बनला. रेडिओ कलाकार, टेक्निशिअन्स, रेडिओ उत्पादन करणाऱ्या कंपन्या, विक्री आणि सेवा देणारे व्यावसायिक या सार्याला व्यापून उरलेला असा हा रेडिओ, मार्कोनी कंपनीने इंग्लंडमध्ये २३फेब्रुवारी १९२० रोजी पहिला रेडिओ कार्यक्रम प्रसारित केलेला होता. हिंदुस्तानात १९२३ सालच्या जून महिन्यात मुंबईतील रेडिओ क्लबने पहिला रेडिओ ध्वनिक्षेपित केला. रेडीओ प्रसारणातून जनसामान्यांचे शिक्षण तसेच मनोरंजन करण्याची महत्वाकांक्षी योजना आखण्यात आली आणि त्यानुसार विविध कार्यक्रम रेडिओद्वारे प्रसार करण्यास सुरुवात झाली. महत्वाच्या घडामोडी, घटना रेडिओमुळे कळू लागले. बँटरीवर चालणारा रेडिओ असल्याने अत्यंत दुर्गम भागात वीज पोहोचली नसल्याने वर्षानुवर्ष या रेडिओनेच जीवनात नवचैतन्य आणण्याचे काम केले. एकापेक्षा एक दर्जेदार कार्यक्रमामुळे रेडिओची लोकप्रियता वाढत गेली.
          २३ जुलै १९२७ रोजी ‘आकाशवाणी’ म्हणजेच ‘ऑल इंडिया रेडिओची’ स्थापना झाली. वृत्त सेवा, संगीत नभोनाट्य, गायन इ. सांस्कृतिक कार्यक्रम, ज्ञान प्रसारणाचे कार्यक्रम असे विविध प्रकारचे कार्यक्रम जनसामान्यापर्यंत पोहोचवण्याचे आणि त्याविषयी जनतेच्या मनात आवड उत्पन्न करण्यात आकाशवाणीचा सिंहाचा वाटा आहे.
             महानगरांच्या घडाळ्याच्या काट्याला बांधलेल्या आयुष्यात खाजगी एफ.एम.चे महत्त्व निराळेच आहे. रोजच्या तणावपूर्ण आयुष्यात मनोरंजनासाठी वेळ कसा द्यावा, हा मोठा प्रश्न ‘एफ.एम.’ने चुटकीसरशी सोडवला आहे. एक अतिशय लहान, वजनाने हलके, वापरायला सोपे असे यंत्र असल्यामुळे महानगरातील जनतेला  मनोरंजनासाठी प्रचंड प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
            आकाशवाणी आणि एफ.एम. या दोन्ही वाहिन्या लोकांचे शिक्षण आणि मनोरंजन करण्यासाठी उदयास आल्या. परंतु या दोन्ही रेडिओ वाहिन्यांचा प्राण किंवा ताकद म्हणजेच ध्वनी.  या ताकदीवरच हे माध्यम गेली अनेक वर्षे वाटचाल करत आलेले आहे. आणि या ध्वनीद्वारे ‘माध्यम’ आणि ‘श्रोता’ यांना जोडणारा महत्वाचा दुवा म्हणजेच निवेदन. रेडिओचा उदय झाला तेव्हापासून निवेदक श्रोत्यांशी नित्यनेमाने संवाद साधत आहे. श्रोत्यांकारीतच निर्मिलेल्या कार्यक्रमरुपी मोत्यांना निवेदक एका सूत्रात गुंफून आकर्षकरित्या पेश करतो. मोत्यांच्या माळेतील न दिसणारा धागा म्हणजेच निवेदक. संपूर्ण कार्यक्रमाची सूत्रे आपल्या हाती ठेवणारा आणि कार्यक्रमावरची आपली जबरदस्त पकड जराही ढिली होऊ न देता श्रोत्यांना खिळवून ठेवणारा असा सूत्रधार म्हणजेच रेडिओ निवेदक. रेडिओवरील निवेदक अथवा निवेदिका याचं श्रोतावर्गाजवळ एक अतूट नातं निर्माण होत. प्रत्येक निवेदकाचा आवाज वेगळा त्याची पद्धत वेगळी त्यामुळे या निवेदक मंडळीजवळ घरातील सदस्य असल्यासारख अनामिक नात निर्माण  होत. आवाजातील गोडवा आपल्याला जवळ आणतो ज्यांना कधीही पाहिलं नाही अश्या निवेदकांना केवळ आवाजावरून त्याचं नाव अथवा कार्यक्रम ओळखण्याची सवय श्रोत्यांना झालेली असते. निवेदक हा रेडिओचा आत्माच म्हटलं पाहिजे.
         निवेदक आणि आर.जे यांच्यातील अंगभूत गुणांबाबत फारसा फरक नाही, भिन्नता आहे ती सादरीकरणाच्या शैलीत. आकाशवाणीचे निवेदन फक्त मनोरंजन म्हणून होत नाही तर त्यात मनोरंजनासाहित शिक्षण व ज्ञान दोन्हीचा समावेश असतो. एफ.एम वरील निवेदनाचा मुख्य हेतू मनोरंजन हा असतो.
             आकाशवाणीवर मुळात काय बोलायचं याहीपेक्षा काय बोलायचं नाही हे संस्कार पक्के असतात म्हणजेच आकाशवाणीवरील निवेदन हे औपचारिक असते. आकाशवाणीच्या निवेदनात सहजता, अचूक शब्दोच्चार, प्रभावी शब्दफेक, आशयानुसार भावाविष्कार, विरामचिन्हाचा अर्थपूर्ण वापर असतो.  आकाशवाणीचे निवेदन सुस्पष्ट व ऐकण्यातही शांत असते.  आकाशवाणीवरील निवेदनासाठी संहिता आधीच लिहिलेली असते. आकाशवाणीचा निवेदक कार्यक्रम सादर करतो  ते व्यक्तिनिरपेक्ष. त्याचे व तिचे व्यक्तिमत्व त्या कार्यक्रमात प्रतिबिंबित होत नाही. आकाशवाणीचा प्रतीनिधी म्हणूनच तो श्रोत्यांसमोर सादर होतो.

                                    एफ.एम. वरील निवेदन उडत्या शैलीचे असते. एफ.एम च्या निवेदनात निवेदक एकच भाषा न वापरता विविध भाषांची सरमिसळ करत असतो. एफ.एम. वरील निवेदानासाठी संहिता आधीच लिहिलेले नसते. त्यामुळे निवेदन अनौपचारिक पद्दतीने केले जाते.  एफ.एम.चा निवेदक स्वतःच कार्यक्रमांच्या केंद्रस्थानी असतो.आपल्या भाव-भावना, आवडी-निवडी एकंदरीत व्यक्तित्व यांच्या अनुषंगाने तो कार्यक्रमाला विशिष्ट चेहरा, रंग-रूप, व्यक्तिमत्व बहाल करतो.त्यामुळे एफ.एम वरील विशिष्ट कार्यक्रम त्या-त्या आर.जे च्या नावाने ओळखले जातात. 

No comments:

Post a Comment