Wednesday, 2 May 2018

परभाषा ज्ञानाचं संपादन करा परंतु स्वतःच्या भाषेतच संभाषण करा.

                                    एखादा बाळ जन्माला येऊन त्याला जेव्हा आजुबाजूच्या परीसराबद्दल कळायला  लागतं, ते मातृभाषेतूनच.प्रत्येकाला आपली मातृभाषा प्रिय असते कारण इतर सर्व भाषांपेक्षा सर्वात जवळची वाटणारी आणि आपले विचार इतरांना पटवून देण्यासाठी सर्वात सोपी भाषा ही आपली मातृभाषा असते. महाराष्ट्राची मराठी  ही जरी एकच  राजभाषा असली तरी प्रत्येक प्रांताची  भाषा निराळी. त्यात कोकणी, वऱ्हाडी, अहिराणी घाटी, असे वेगवेगळ्या भाषा आहेत. मराठी भाषा ही जगातील प्रमुख भाषांपैकी एक आहे.
परंतु आजच्या जागतिकीकरणाच्या काळात मराठी भाषा आणि संस्कृती नष्ट होण्याची चिन्हे जास्त प्रमाणात दिसत आहेत. आजच्या तरुण मंडळींना इंग्रजी भाषेचे जास्त आकर्षण आहे कारण त्यांचं महाविद्यालयीन आणि उच्च शिक्षण सर्व इंग्रजीतून होत असतं. आपल्या मातृभाषेतून शिक्षण घेतलं तर बाहेरच्या जगात आपला निभाव लागणार नाही. असे आजच्या तरुणांचं मत आहे. यामुळे शिक्षणासाठी इंग्रजी सारख्या परक्या भाषेचा स्वीकार केल्याने मराठी भाषा धोक्यात आली आहे.
इथे एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यावी लागेल की, स्वतःच्या भाषेतून आपल्याला जेवढे सहज व्यक्त होता येते तेवढे इतर भाषेतून होत नाही. म्हणून मातृभाषा सर्वार्थाने आत्मसात करावी. तसेच ज्ञान वाढवण्यासाठी म्हणून इतर भाषाही आत्मसात करावे. प्रत्येक मराठी माणसाला मराठी भाषा बोलता, लिहिता, वाचता आली पाहिजे. परदेशात गेलात तरी आपल्या मराठीला विसरु नये.
मराठी भाषा संवर्धनासाठी आधुनिक प्रयत्न होताना दिसत आहेत. जागतिक संदर्भात मराठी भाषिकांचे प्रचंड संख्या पाहायला मिळते. संगणक तंत्रज्ञान मराठी भाषेत उपलब्ध होत आहे. विविध ज्ञानशाखांमधील उपयुक्त ज्ञान मराठीत येत आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे 'मराठी विकिपीडिया'.

                          मराठी भाषेचे महत्व, मराठी भाषेचा गोडवा हे ज्याला कळल त्याच्यासाठी मराठी भाषाही मोठे धन आहे. आई-वडिलांनी शिकवलेल्या मराठी मातृभाषेला विसरणे म्हणजे आई-वडिलांनाच विसरल्यासारखे आहे. म्हणून परभाषा ज्ञानाचे संपादन करा परंतु स्वतःच्या भाषेतच संभाषण करा.

स्मार्ट शहरे कि प्रदूषित शहरे

                    देशातील जास्तीत जास्त शहरे स्मार्ट बनविण्याचा  संकल्प करण्यात आला. स्मार्ट शहरे म्हणजे स्वच्छ व सुंदर शहरे. जिथे पायाभूत सुविधा असतील, जिथे शाश्वत विकासाला प्राधान्य असेल, जिथे पायाभूत सुविधांची कमतरता नसेल. प्रत्येक कामासाठी स्मार्ट सुविधा असतील .स्मार्ट सिटीमध्ये प्रामुख्याने पायाभूत सुविधा, ई-प्रशासन, पुरेसा पाणी पुरवठा, सुनिश्चीत वीजपुरवठा, घनकचरा व्यवस्थापन, सक्षम सार्वजनिक परिवहन अश अनेक प्रकल्पांचा समावेश आहे. परंतु नुकताच  जागतिक आरोग्य संघटनेने प्रसिद्ध केलेल्या  प्रदूषण संदर्भातील अह्वालामुळे शहरे  स्मार्ट होत आहेत कि प्रदूषित याची शंका निर्माण होत आहे.
                  
                 जागतिक आरोग्य संघटनेने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या जगातील सर्वाधिक वीस प्रदूषित शहरांच्या  यादीत सर्वाधिक भारतीय शरंचा समावेश आहे. या यादीतील वीस पैकी चौदा प्रदूषित शहरे 
हि केवळ भारतातच आहेत. दिल्ली, मुंबई, कानपूर फरीदाबाद, गया,पाटणा, आग्रा, मुझ्झफुरनगर, जयपूर, जोधपुर यासारख्या शहरात प्रदूषणाची पटली सर्वाधिक आहे असे या अहवालात म्हटले आहे. या अहवालानुसार मुंबई शहराचा जागतिक स्तरावर चौथा क्रमांक आहे. वाढते उद्योगधंदे, वाढते शहरीकरण, वाढते लोकसंख्या यामुळे  व अशा अनेक कारणांमुळे पर्यावरनाची हानी होत आहे .स्मार्ट सिटी साठी निवडलेल्या शहरांचाच या प्रदूषित शहरांच्या आहवालात जास्त प्रमाणात समावेश आहे. त्यामुळे या प्रश्कडे लक्ष देणे गरजेचे आहे.           
              पर्यावरण  संरक्षण हि एक सामाजिक जबाबदारी असून त्यासाठी पर्यावरण सरंक्षण करणे हि सर्वांची सामाजिक बांधिलकी आहे. पृथ्वीवरील सर्व सजीव सृष्टींचा आधार पर्यावरण  आहे. पृथ्वी सोडून इतर कोणत्याही ग्रहावर यासारखे पर्यावरण नाही. त्यामुळे येथील  पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन करणे सर्व सजीव सृष्टीस अत्यावश्यक आहे. कोट्यवधी वर्षाच्या स्थित्यंतरानंतर येथील हवा, पाणी व जमीन यांचे पोषक असे वातावरण तयार झाले असले तरी गेल्या काही दशकात मानवी उद्योगामुळे त्यात बरेच बदल होत आहेत. त्यामुळे शहरे स्मार्ट करण्याच्या अगोदर प्रदूषण विरहीत शहरे निर्माण करणे गरजेचे आहे.