Wednesday, 2 May 2018

परभाषा ज्ञानाचं संपादन करा परंतु स्वतःच्या भाषेतच संभाषण करा.

                                    एखादा बाळ जन्माला येऊन त्याला जेव्हा आजुबाजूच्या परीसराबद्दल कळायला  लागतं, ते मातृभाषेतूनच.प्रत्येकाला आपली मातृभाषा प्रिय असते कारण इतर सर्व भाषांपेक्षा सर्वात जवळची वाटणारी आणि आपले विचार इतरांना पटवून देण्यासाठी सर्वात सोपी भाषा ही आपली मातृभाषा असते. महाराष्ट्राची मराठी  ही जरी एकच  राजभाषा असली तरी प्रत्येक प्रांताची  भाषा निराळी. त्यात कोकणी, वऱ्हाडी, अहिराणी घाटी, असे वेगवेगळ्या भाषा आहेत. मराठी भाषा ही जगातील प्रमुख भाषांपैकी एक आहे.
परंतु आजच्या जागतिकीकरणाच्या काळात मराठी भाषा आणि संस्कृती नष्ट होण्याची चिन्हे जास्त प्रमाणात दिसत आहेत. आजच्या तरुण मंडळींना इंग्रजी भाषेचे जास्त आकर्षण आहे कारण त्यांचं महाविद्यालयीन आणि उच्च शिक्षण सर्व इंग्रजीतून होत असतं. आपल्या मातृभाषेतून शिक्षण घेतलं तर बाहेरच्या जगात आपला निभाव लागणार नाही. असे आजच्या तरुणांचं मत आहे. यामुळे शिक्षणासाठी इंग्रजी सारख्या परक्या भाषेचा स्वीकार केल्याने मराठी भाषा धोक्यात आली आहे.
इथे एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यावी लागेल की, स्वतःच्या भाषेतून आपल्याला जेवढे सहज व्यक्त होता येते तेवढे इतर भाषेतून होत नाही. म्हणून मातृभाषा सर्वार्थाने आत्मसात करावी. तसेच ज्ञान वाढवण्यासाठी म्हणून इतर भाषाही आत्मसात करावे. प्रत्येक मराठी माणसाला मराठी भाषा बोलता, लिहिता, वाचता आली पाहिजे. परदेशात गेलात तरी आपल्या मराठीला विसरु नये.
मराठी भाषा संवर्धनासाठी आधुनिक प्रयत्न होताना दिसत आहेत. जागतिक संदर्भात मराठी भाषिकांचे प्रचंड संख्या पाहायला मिळते. संगणक तंत्रज्ञान मराठी भाषेत उपलब्ध होत आहे. विविध ज्ञानशाखांमधील उपयुक्त ज्ञान मराठीत येत आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे 'मराठी विकिपीडिया'.

                          मराठी भाषेचे महत्व, मराठी भाषेचा गोडवा हे ज्याला कळल त्याच्यासाठी मराठी भाषाही मोठे धन आहे. आई-वडिलांनी शिकवलेल्या मराठी मातृभाषेला विसरणे म्हणजे आई-वडिलांनाच विसरल्यासारखे आहे. म्हणून परभाषा ज्ञानाचे संपादन करा परंतु स्वतःच्या भाषेतच संभाषण करा.

No comments:

Post a Comment